November 10, 2009

गमते उदास..

खरं तर हे, असले श्रद्धांजलीवाले लेख लिहायला मला मुळीच आवडत नाही! जमत तर त्याहूनही नाही! मुळात, ज्यांच्या निधनामुळे काही हरवलं आहे असं वाटावं, अशी माणसं बोटांवर मोजण्याइतकीही नसतात, आणि अशी माणसं कायमची उठून गेल्यावर काय सुचणार लिहायला तरी? तेह्वा, मग लिहिणार तरी काय... तरीसुद्धा, सुनिताताई, तुम्हांला, तुमची एक वाचक म्हणून काही सांगावसं वाटलं, म्हणून ह्या लेखनप्रपंचाचा प्रयत्न.

तसा आपला संबंध फक्त लेखिका आणि वाचक ह्या कुळीतला. एवढाच. खरंतर, एकतर्फीच संबंध, म्हणजे, मीच एक वाचक म्हणून, प्रथम तुमच्या लिखाणाशी आणि नंतर, लिखाण वाचता वाचताच कधीतरी आपसूक तुमच्याशी जोडलेला.

तुमच्यासारखं, लिखाणातून क्वचितच कोणी इतक्या कसदार आणि निर्भयपणे प्रतिबिंबित होत असेल.. की झालं असेल, म्हणू आता? कळतेपणी तर नाहीच, पण नकळतसुद्धा इतर कोणापाशी, इतक्या सहजासहजी स्वत:कडे कमीपणा घेण्याचा मनाचा मोकळॆपणा असेल, स्वत:च्या चुका, घोडचुका, क्वचित प्रसंगीचा करंटेपणा इतक्या स्वच्छपणे, सरळ साध्या शब्दांत, वस्तुनिष्ठपणे मांडायचं धैर्य असेल असं वाटत नाही. हे असं तुम्ही कसं लिहू शकलात? कुठेही स्वत:ला वा कोणालाच झुकतं माप नाही, फुकटची स्तुती नाही, उगाचच भरीचा मीठ मसाला नाही! जे जसं आहे, होतं, जसं घडलं, तसंच आणि तेवढंच. नेहमीच. कोणतीही सारवासारव न करता, नसते, अर्थहीन लटके खुलासे न करता, कोणत्याही सबबींचा आधार न घेता, एवढं प्रांजळ लिखाण करायची विलक्षण अशी हातोटी, तुम्ही कशी साधलीत? ह्या एका लखलखीत आणि दुर्मिळ गुणामुळे तुम्ही मला खूप खूप आपल्या वाटलात! वाचक म्हणून सुनिता देशपांडे ह्या लेखिकेशी माझे सूर कायमचे जुळून गेले...

तुमचं लिखाण वाचताना मला नेहमी ह्या ओळी आठवतात,

कडाडणारी वीज नव्हे जी
जाळून टाकील अवघ्या जगतां
शिशिर ऋतूतील गोठविणारा
हा थंडीचा नव्हे गारठा
गर्भरेशमी सौंदर्याची
सुरेख नाजूक निसर्गलेणी
अधरांवरती अवतरलेली
राजस हळवी सुरेल गाणी...

असं काहीसं आहे तुमचं लिखाण. तुमचे सगळे बरे, वाईट अनुभव तुम्ही उत्कटतेने, मनापासून जगला असाल ना? नक्कीच. म्हणून तर तुमच्या लेखणीतून उतरलेलं परखड आणि तरीही आपलंसं वाटणार लिखाण मनाचा ठाव घेणारं ठरलं. वाचताना कुठेतरी तुमच्याशी संवाद साधला गेला, आणि निर्भीड असलं, तरी त्या लिखाणातला सात्विकपणा, कळत नकळतसा हळवा, हळुवार भाव मनात घर करुन राहिला, नेहमीच. साध्या शब्दांत, किती परिणामकारक, उत्कट आणि मनाला स्पर्शून जाणारं, अंतर्मुख करणारं लिहिलंत तुम्ही.... तुमचं लिखाण वाचताना, कधी कधी, हेच, अगदी हेच, आपल्याही मनात येऊन जातं, गेलेलं आहे, असं वाटत रहायचं, आणि मग तुमच्याशी अधिकच जवळीकीचं नातं जडत गेलं. तुम्हांलाही कवितांची असोशी आहे, असं कळलं, आणि जीव सुपाएवढा झाला! तुम्ही मूळ कोकणातल्या हे कळलं, आणि मनातल्या मनात, कोकणातल्या लाल रस्त्यांवरुन तुमच्या संगतीने मीही फिरुन आले. अगदी, न पाहिलेल्या धामापूरच्या तळ्याच्या आणि देवळाच्या परिसरातही भटकले... आपली कोकणातली माणसंच मनस्वी, नाही? तुमच्या मनस्वी लिखाणाचे गूढ थोडेफार उकलले का?....

किती आणि काय, काय सांगावसं वाटतं... पण तुमच्यासारखी शब्दकळा माझ्यापाशी नाही. अंतरीच्या गाभ्याला हात घालण्याची ताकद माझ्या शब्दांत नाही. तुम्ही तुमच्या शब्दकळॆच्या रुपाने सतत सोबत आहातच, पण तरीही तुम्ही आता लौकिकार्थाने ह्या जगात नसणार आहात, ह्याचं अत्यंत शब्दातीत असं दु:खही आता माझ्या मनात कायमचं कुठेतरी गोठून राहील.... त्याला इलाजच नाही ना! अणि काय सांगू?

सुनीताताई, आता मात्र खरोखरच, गमते उदास.......

October 23, 2009

बंगलोर सेंट्रल लायब्ररी

बंगलुरु की गलियाँ




बंगलुरुच्या गल्ल्यांमधून फिरताना काढलेला एक फोटो.

October 10, 2009

झुरळे, पाली आम्हां सोयरी...

खरं सांगायचं तर मला पालींची खूप म्हणजे खूपच भीती, किळस वा तत्सम जे काही असतं, ते सगळं वाटतं! पाल अंगावर वगैरे पडणं म्हणजे जगबुडी व्हावी बहुधा! एकदम यक्, यक्! भयाण!

अगोदरच्या घरात पाल नव्हती अजिबात. नवीनच घर बांधलं होतं आणि घरमालक स्वतः रहायच्या आधी मी तिथे भाडेकरु म्हणून रहायला गेले. पाल - झुरळ विरहीत घर म्हणजे एक सुखस्वप्नच प्रत्यक्षात उतरल होतं! अर्थात, त्याऐवजी मुंग्या होत्या! पण त्या चालतात, आणि त्या काळ्या होत्या. लहानपणी म्हणत असू, काळ्या देवाच्या असतात, लाल चावकुर्‍या... :)

पहिलं घर छानच होतं, भरपूर प्रकाश येणारं घर. बंगळुरुमधे प्रकाशमान घर मिळणं म्हणजे दुग्धशर्करा योग आहे म्हटलं! पण मग सद्ध्याच घर बदललं, कारण, घरमालक आता त्याच्या घरी रहायला येणार होता. हे नवं घर तस जुनं आहे, बैठं. हेही छान आहे, लहान आहे, त्यामुळे आवराआवरी आणि साफसफाई पटकन होते! जमेची बाजू. घेताना घरमालकाने नवीन रंग वगैरे काढून दिलं होतं, त्यामुळे पाली, झुरळं नसतील असं मी समजून चालले होते. पण कसलं काय! नवीन घरात सामान आणून टाकलं, व्यवस्थित लावलं, तोपर्यंत ही मंडळी दबा धरुन बसली होती की काय कोणास ठाऊक! मग एकेक झुरळं बाहेर पडायला लागली, ही एवढाली! कधी नव्हे ती मी १०-१२ झुरळं तरी मारली असतील! आणि झुरळंही मला तेवढीच अप्रिय आहेत! फक्त त्यांना माझी भीती वाटायचय ऐवजी मला त्यांची भीती वाटते! तरीपण, हिय्या करुन मारलीच! सरवायव्हल ऑफ द फिटेस्ट, म्हणतात हे हेच असावं! :D

असो. तर झुरळं मेली, राहिलेल्यांवर हीट आणून मारलं, मग ती मेली. राहता राहिल्या पाली. स्वयंपाकघरात एक, तिथल्या ओट्यावर फुदकणारी. स्वच्छ असतो ओटा, कोणी काही शंका घेण्याआधीच सांगते! दिवाणखान्यात बहुधा दोन असाव्यात, आणि झोपायच्या खोलीत दोन. एकूण ५ आहेत, मला ठाऊक असलेल्या. तसं, आम्ही एकमेकींना टाळायचोच. त्याही अन् मीही. त्यामुळे ठीकठाक एकमेकींचा अंदाज घेऊन वावर चालायचा. काहीही केलें तरी उपयोग नसतो, पाली कुठेही जात नाहीत बहुधा.

मध्यंतरी घरी गेले. परत आल्यावर काही तरी वेगळे वाटले खास. माझी समजूत होती स्वयंपाकघरातल्या ओट्यावर पाल्केस्ट्रा सुरु असेल, पण नाही. नंतरचे २ दिवस पाहिले, तरीही चाहूल नाहीच! झोपण्याच्या खोलीतल्या पण गायब! दिवाणखान्यात एकच दिसली!

अरेच्या, म्हटलं झालं काय! गेल्या कुठे सख्या! चक्क मी पालींची वाट वगैरे पाहिली, काय झालं असेल त्यांना, मेल्या की कावळ्याने खाल्ल्या, की प्रेग्नंट आहेत वगैरे हजारो प्रश्न माझ्या मनात उभे राहिले! चक्क जरा काळजी वगैरे वाटली! आत्ता झोपायच्या खोलीतली एक ह्या टोकापासून त्या टोकापर्यंत धावली! आली, आली! :) दुसरी कुठेय काय माहित! स्वयंपाकघरातली गुल्लच आहे! असो बापडी. आणि आज एक छोटुलंही दिसलं त्यांच! माझी शंका बरोबर होती म्हणायची! एकूण सगळ्या पालींमध्ये एक पालोबाही आहे वाटत! देवा रे! वाचव!

पुढचे काही दिवस आता घरात अंड्याचं कवच प्रत्येक खोलीत ठेवाव लागणार! त्याने पाली येत नाहीत म्हणे, नायतर पालीला दिली भिंत आणि पाल घरभर पसरी, असं व्हायचं! भूतदया गेली खड्ड्यात!

काय म्हणता?

September 29, 2009

पिवळ्या पंखांचा पक्षी

असं म्हणतात की कोकणात परसबागेत जिथे केळी असायच्या तिथे कर्दळीही!
केळ जशी नवपरिणित वधूसारखी, तशी फुललेली पानेरी कर्दळ ही सचैल न्हालेल्या षोडशेसारखी!

महानोरांच्या एका गीतातील काही ओळी आठवतात,

पिवळ्या पंखांचा पक्षी नाव सांगेना..
बाई, श्रावणाचं ऊन मला झेपेना..

आता शिशिर ऋतूही उंबरठ्यावर येऊन ठेपलाय. थोड्याच दिवसांत 'इदं न मम' म्हणून समस्त वृक्षवल्ली, प्रवृत्तीकडून निवृत्तीकडे जात, संन्यस्त भावाने पर्णसंभाराचा त्याग करेल. नंतर येईल अखिल समष्टीला नवचैतन्य देणारा वसंत! त्या गर्दकेशरी वसंताची उत्सुकतेने वाट पाहात ही पीतवस्त्रा कर्दळ, सचैल न्हालेल्या षोडशेसारखी आत्ता पासूनच थटून बसलीय!